सोमवार, १९ एप्रिल, २०२१

 #आजचाबेत-३

तुम्हाला "बंटी और बबली" आठवतो का?
आठवत असेल तर त्यातला शेवटचा बबलीचा (राणी मुखर्जी) डायलॉग आठवतो का जिथे ती दशरथ सिंगच्या (अमिताभ बच्चन) च्या समोर राकेशला (अभिषेक बच्चन) म्हणते,
"मैने, मैने एक और मर्तबा आम का अचार बनाया तो मैं मर जाऊंगी | मैं मर जाऊंगी राकेश |"
त्या बबलीने चांगुलपणाच्या घरेलू बुरख्याला उबून अगदी रडकुंडीला येऊन तिने मारलेला हा डायलॉग मी इतक्या प्रेमाने झेलला होता कि आज ही तो माझा वन ऑफ द फेवरेट आहे.
मला तो इतका आवडला होता की मी पोट धरून हसले होते कारण बंटी च्या जागी मला मीच दिसत होते.
एकूणच किचन मधला सुग्रावा हा ऑप्शनल असायला पाहिजे. तो कंपल्सरी/अनिवार्य झाला कि आपली बबली होते वा बबली मध्ये आपण स्वतःच दिसायला लागतो.
सांगायचे तात्पर्य सध्याचा कैरी महोत्सव हा पूर्णपणे ऐच्छिक सिलॅबस आहे.
जेव्हा तुमची मैत्रिण सुनीला तिच्या दारातल्या भल्यामोठया डेरेदार आंब्याची एकएक कैरी मोठ्या शिताफीने तोडून तुमच्या घरी वाणवळा पोच करते तेव्हा हा सिलॅबस तुमचा फेवरेट सब्जेक्ट झाल्याशिवाय राहील का?
हे सगळं करण्यात आणि खिलावण्यात मिटक्या मारणारा आंबट-गोड आनंद ही आहेच.
आजचा छुंदा मैत्रिण प्रणालीच्या आई ची पाककृती आहे.
पुण्यातून कोणार्क एक्स्प्रेस ने भुवनेश्वर गाठावे लागायचे तेव्हां ३० ते ३२ तास रेल्वेत जायचे. बहुतेक वेळा प्रणालीच्या आईने डबा दिलाय आणि त्यात हा छूंदा असायचाच.
जेवायला अनिच्छ असणार्या ५-६ वर्षाच्या राऊचा सगळा प्रवास त्या छुंद्यावर तारून जायचा.
या छुंद्याच्या निमीत्ताने तो जवतोय हे माझ्यातल्या आई ने लगेच हेरले व ही रेसिपी शिकून घेतली.

मागच्या १०-११ वर्षांत उन्हाळ्यात कैरीचे काही करणे होवो अथवा न होवो पण एक काचेची बरणी एमाने ईतबारे छुंदा तिच्यात मोठया हौसेने सामावून घेऊन ८-१० दिवस कडक उन्हात उभी असते.
लहानग्या राऊला आत्ता मिसरूड फुटायला लागलीत त्याच्या अनेक आवडी निवडी बदलल्या पण छुंदा प्रेम अबादित आहे.
करायला अगदी सोपी सुटसुटीत अशी ही रेसिपी नव्याने स्वयंपाक शिकणाऱ्यासाठी “नवनीत चे 21 अपेक्षित” आहे.

मी ७ कैऱ्या धुवून पुसून सोलून घेतल्या. सोलूनच घ्यायच्या तर धूत पुसत कशाला बसायचे?
पण तसं नाही. ते करायलाच लागतं. कारण, हं बरोबर बोलतात द्या टाळी- शास्त्र असतं ते !
सोलून पडलेली सालं मुकाटयाने. गोळा करून एखाद्या रोपाच्या बुडाला पुरायची किंवा कंपोस्टच्या कुडींत रवाणगी करायची.
सोलून घेतलेल्या कैऱ्या किसून घ्यायच्या. किसलेल्या कैऱ्या वाटीने किंवा कुंड्याने मोजून घ्यायच्या.
ती किसलेली कैरी चाखून बघायची. खूप आंबट असेल तर पडलेल्या खिसा च्या अर्धी साखर घ्यायची - १:१/२


कैरीचा कीस गोड असेल तर अर्ध्यापेक्षा थोडी कमी साखर घ्यायची-१:१/३

तुम्हाला तिखट कसं आवडतं त्या अंदाजाने तिखट घ्या मी इथं पावूण वाटी तिखट घेतलेय.
मीठ, मीठ मी पाऊण वाटी घेतलेय.
हे सगळं मिसळून घ्यायचं स्वच्छ निर्जंतुक केलेल्या काचेच्या बरणीत भरायचं (प्लास्टिक ही चालेल) ही बरणी तलम सुती कापड तोंडाला बांधून किंवा दुधाची जाळी झाकून पुढचे आठ-दहा दिवस कडक उन्हात रोज पाच-सहा तास ठेवायची.

कैरीचा वाणवळा दिलेल्या मैत्रिणीला चवीला म्हणून हात आकडता घेत बरणी अर्धीच भरायची. आवडले तर पुन्हा देईन असं म्हणत आपल्या कद्रू मनावर आपणच पांघरून घालायचे. वरून वार्यावावदळात कैर्या पडल्यातर पुन्हा कैर्या पाठव(च) असे ही आपला हावरटपणा झाकून सांगायला विसरायचे नाही !


ही बरणी तुम्ही अंगणात, गच्चीवर, बाल्कनीत ठेवणार असाल उन्हाळ्यातल्या वळीवापासून सावधान कारण पावसाचा एखादा शिंतोडा तुमच्या या सगळ्या केल्या धेल्यावर पाणी पाडेल वा पाणी पाडायला पुरेसा आहे!!

©️सुलभा जाधव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा