मंगळवार, ३ नोव्हेंबर, २००९

विरह


मन खिन्न असतं

स्वत:शीच म्हणतं,

बघ, हे नव्हतंस ना अनुभवलंस?

हे बघ, याला म्हणतात

विरह...

एखाद्या कवितेत,कथेत वाचलेला

चित्रपटात दिसलेला

हाच तो विरह

त्यावेळी वाटायचं

हा विरह कित्ती छान अभिव्यक्ति आहे.

का बरं असं वाटायचं?

ज्यावेळी त्याची अनुभूती येते

तेव्हा मात्र हे असह्य असतं...

सगळं निर्जीव वाटू लागतं,हिरवळ सुकलेली वाटते

उदास, बेचैन असं बरंच काही..

पटतं, की जे सौंदर्य तेव्हा अनुभवलं ते या मनानंच निर्मिलं होतं

आणि ही विरूपता ही त्याचीच निर्मिती..

हे काय चाललंय?

असंच नक्की वाटतं का?

हे असंच वाटतं असंही नाही म्हणता येत,

पण असंच काहीतरी.. आशय तोच.

संध्याकाळी खिन्न असताना

वाऱ्याबरोबर वाहत येतात काही अनोळखी सूर

तेही विरहच आळवत असतात

पण ते ऐकून खिन्नता कुठल्याकुठे पळून जाते

कारण कोंडलेल्या भावनेला वाचा फुटलेली असते...



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा