मंगळवार, १५ डिसेंबर, २००९

सुगरण -३


सकाळी जिना उतरुन खाली आले तेव्हा अंगणात (फुटलेली दोन) अंडी पडलेली दिसली. दोन फुटलेली एक शाबूत..कावळा पहाटेच आपलं काम करून गेला होता वाटतं. त्याला अंडीच खायची होती तर या फुटलेल्या अंड्यांचा चट्टामट्टा का नाही केला त्याने? तो जिंवत पिलांच्या शोधात तर नाही? शाबूत अंडं मी अगदी काळजीपूर्वक पुन्हा खोप्यात ठेवलं.


आता मात्र मी ठरवलं, सुगरण सिरीयल पाहणं बंद करणं योग्य. कशासाठी मनाला चुटपुट लावून घ्यायची? आज फुटलेली अंडी बघायला मिळाली. उद्या काय वाढून ठेवलं असेल कोणास ठाऊक? दुपार पर्यत माझा निश्चय दृढ राहीला. त्यानंतर मात्र डळमळला. मन खोप्याकडे धाव घेऊ लागलं. मी बाल्कनीत येवून थांबले. जणू काही झालेलंच नाही अशा थाटात सगळं सुरळीत चालू होतं. कावळ्याचा काही मागमूस नव्हता. त्याला कळून चुकलं असावं याचा नाद सोडलेला बरा! सुगरणी त्यांच्या कामात गर्क. ज्यांच्या घरट्यांतून अंडी पडून फुटली ते सुगरणही (कदाचित) काहीच झालं नाही अशा भावात खोप्याची डागडुजी करत होते. वर वर बघता खोपे बांधून तयार होते. काही खोप्यांत पिल्लांनी जन्म घेतला असेल. म्हणून तर काही सुगरणी खोप्यांच्या नळकांड्यांतून फर्र्कन ये जा करताना दिसत होत्या. वरचे वर खोप्याची वीण घट्ट होत चालली आहे. पक्क्या विणीत पिल्लं अधिक सुरक्षित आहेत.कधी मी आळसावलेली असेन, उदास असेन, परिस्थितीपुढे हतबल असेन, निराशेचे मळभ मनात दाटलेले असेल, आता सगळं संपलं असं वाटेल, तेंव्हा ही सुगरण नक्कीच मला मदत करेल!खोप्यावर पाय रोवून अविरत एका काडीनंतर दुसरी काडी आणून त्याचा प्रत्येक टाका घट्ट सांधणाऱ्या या ज़सुगरणींशी नकळत माझे नाते जडते.


1 टिप्पणी: