हे पिल्लु (पांढऱ्या रंगाचे) आमच्याकडे आले तेव्हा ४५ दिवसांचे होते. त्याच्या साथीदारांमधे/भाऊबंदामधे/जातवाल्यामधे याचे रुप फारच देखणं . या पिल्लाचं चालणं,याचा रंग यावरुन एकमताने त्याला नाव मिळाले "ऐश्वर्या".
साधारण ४-५ महीन्याने जेव्हा याला तुरा फुटू लागला तेव्हा आमच्या लक्षात आले
ही" ऐश्वर्या "नाही. हे पिल्लु "तो" आहे आणि बिच्चारं लगोलग अनामिक होवून बसलं.
दिवस गेले. महिने गेले. एक दिवस चिरंजीव(वय वर्ष ६ १/२ ) ओरडत घरात आले,
" आई, इथं काय करत बसली आहेस ? तिकडं चल सिकंदर आणि पोरसचं युद्ध जुंपलं आहे "
" कोण सिकंदर ? कोण पोरस ? कसलं युद्ध ? .....मी तुला म्हणाले होते ना T.V. बघायचा नाही म्हणून . जा बॅग भर ट्यशनची वेळ झाली."
" नाही तु चल आगोदर बाहेर "
काहीतरी प्रताप पहायला मिळणार गेलच पाहिजे बाहेर . बाहेर जावून बघते तर चिरंजीव सांगतात:
"हा सिकंदर-
हा पोरस-
यांच युद्ध चालू होतं. ( खरच यांच्यात चांगलीच जुंपली असणार. बिच्चाऱ्या पोरसच्या शेपटीचे एकच पीस शिल्लक आहे! )
बघतच उभी राहिले . माझ्या कडून जे बारसं होवू घालतच नव्हते ते या पठ्याने चूटकी सरशी करुन टाकले. उत्सुफपणे मी मनाशी म्हणाले जर "ही दोघं" सिकंदर-पोरस असू शकतात तर या "त्रिकुटाचे" बारसं बादशहा,बेगम,बिरबल असं का नाही...?